गुरू-शिष्य नात्याचा अभिमानास्पद क्षण; गुंजकर सरांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन

खामगाव : “ज्या विद्यार्थ्याला वर्गातील भिंतीवर शायरी लिहल्यामुळे शिक्षक शिक्षा करत होते त्याच शिक्षकांच्या हस्ते त्या विद्यार्थ्याच्या लिखाणाचे आज त्याच गुरूंच्या हस्ते पुस्तक रूपाने प्रकाशन होणे, ही केवळ घटना नसून शिक्षण व्यवस्थेतील एक प्रेरणादायी क्षण आहे,” असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

खामगाव येथील गुंजकर एज्युकेशन हब येथे युवा लेखक, प्रतिलिपी लेखक व पत्रकार निलेश कवळे यांच्या “चार लोक काय म्हणतील” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दि २७ जून रोजी उत्साहात पार पडला. विशेष म्हणजे, या पुस्तकाचे प्रकाशन प्रा. गुंजकर सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारे शिक्षक म्हणून विदर्भात प्रा. गुंजकर सर यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते.

निलेश कवळे हे विद्यार्थी दशेत असताना वर्गातील भिंतीवर शायरी लिहिणारे म्हणून ओळखले जायचे. त्याच लेखनातून प्रेरणा घेत त्यांनी समाजातील वास्तव, भीती, दबाव आणि “चार लोक काय म्हणतील” या मानसिकतेवर भाष्य करणारे हे पुस्तक साकारले आहे. त्यामुळे त्यांच्या या प्रवासाचे विशेष कौतुक होत आहे.

प्रकाशन सोहळ्यावेळी बोलताना प्रा. गुंजकर सर म्हणाले की, “विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण ओळखून त्यांना योग्य दिशा देणे हे शिक्षकांचे कर्तव्य आहे. निलेशने आपल्या लेखनातून समाजाला सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे, ही अभिमानाची बाब आहे.”

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा. सौ. सुरेखाताई गुंजकर, गुंजकर कॉलेजचे प्राचार्य श्री. सतीश रायबोले, राज्य परिवहन महामंडळाचे श्री. सचिन कवळे तसेच लोकसंवाद चर्चापत्रचे मुख्य संपादक मंगेश बहुरूपी यांची उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली.

कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. उपस्थितांनी निलेश कवळे यांच्या लेखनाचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. “चार लोक काय म्हणतील” हे पुस्तक तरुणांना आत्मविश्वासाने निर्णय घेण्याची प्रेरणा देणारे ठरणार असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले.

या सोहळ्याने शिक्षक-विद्यार्थी नात्याची एक सुंदर परंपरा अधोरेखित केली असून, शिक्षण क्षेत्रात एक सकारात्मक संदेश देणारी ही घटना ठरली आहे.

1 Comments

Post a Comment

Previous Post Next Post